अखिल भारतीय मराठा महासंघ​

लग्नसाक्षरता

ही एक घटना आहे.

दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील नवविवाहित जोडप्याच्या लग्नाला वीस-बावीस दिवस झाल्यानंतर नवरी मुलीने नवऱ्याला विचारले की तुम्ही कामाला कधी जाणार ?
तेव्हा नवऱ्या मुलाने त्याच्या बायकोला सांगितले मला रोज कामावर जायला लागत नाही ?

तेव्हा ती म्हणाली ही असली कसली तुमची ड्युटी ? तुम्ही तर पोलीस आहात ना ? तेव्हा तो म्हणाला मी पोलीस नाही होमगार्ड आहे. आम्हाला वर्षात ठराविक वेळीच ड्युटी असते इतर वेळी नाही.

तेव्हा ती त्याला म्हणाली मध्यस्थानी आम्हाला तुम्ही पोलिस आहे असे सांगितले.
तेव्हा तो म्हणाला माझ्या खाकी ड्रेस वरून त्याला मी पोलीस आहे असे वाटले असेल त्याला मी काय करणार ? मी तर होमगार्ड आहे.

दुसरी एक घटना

लग्न झाल्यानंतर लगेचच कोरोना काळ सुरु झाल्यानंतर एमआयडीसी परिसरातील कारखाने बंद झाले.
नोकरी गेलेल्या मुलाने स्वताच्या गावाला जाण्यासाठी त्यांच्या राहत्या flat मधील सामान टेम्पोत भरून flat ची चावी त्या इमारतीच्या मालकाला दिली. तेंव्हा त्याची नववधू असलेली बायको त्याला म्हणाली अहो चावी त्यांना कशी काय देता ?

तेंव्हा त्याने निर्विकारपणे उत्तर दिले हा आपला flat नसून त्यांचा आहे . तेंव्हा त्याला बायकोने सांगितले कि आम्हाला मध्यस्थाने सांगितले कि मुलाचा नवीन कर्ज काढून घेतलेला flat आहे शिवाय गावाकडे घर आहे.

पूर्वीच्या काळामध्ये पंचक्रोशीतील गावामध्येच सोयरिकी व्हायच्या.

नातेसंबधात दोन्ही परिवारांची माहिती असायची. लग्न ठरवणाऱ्या व्यक्ती समाजात स्थान असलेल्या असायच्या व सामाजिक काम म्हणून आवडीने ते काम मोफत करायचे.
नंतरच्या काळात वधूवर संस्था उदयाला आल्या. मध्यस्थ म्हणून सेवाभावी काम करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. गावातली लोकसंख्या मोठ्या शहरात स्थिरावली तर काही इतर राज्यात देश परदेशात स्थिरावली.
नाते संबधात लग्नसोहळे सोडले तर येण्याजाण्याचे प्रमाण कमी झाले.
नव्या पिढीला भाऊबंद नातेवाईक कोणकोण आहेत याची माहिती नाही.

त्यामुळे आता लग्न ठरवताना वधूवर सूचक मंडळ, Online मेट्रोमेनी साईट वर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या वाढली.
अशा स्थितीत फसवणूक व दिशाभूल करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
एखाद्याला नोकरी देताना त्याची कागदपत्रे पाहूनच नोकरी देतात.
कर्जदाराला बँका त्याची कागदपत्रे ,सिबिल पाहूनच कर्ज देतात.
आयुष्याचा संसार करायला लग्न ठरवताना आता नोकरी व आर्थिक परिस्थितीची कागदपत्रे पाहण्याची आवश्यकता काळाची गरज आहे का ? –
विवाह सोहळे चालले कोणीकडे ? पुढच पाऊल जनजागृती पुस्तिकेतून …

राजेंद्र कोंढरे अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ

#kondharespeak
#pudhachpaul
#maratha